पुणे : ‘प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि चिकित्सक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. खेड्यापाड्यांतील मुला-मुलींमध्ये उत्तम प्रतिभा, बुद्धिमत्ता आहे; पण मोठ्या यशात त्याचं रूपांतर करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती हवी. सबबी सांगून चालणार नाही. अडचणींचे बुजगावणे करू नका,’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी, २१ जानेवारी रोजी तरुणांना दिला.
पंच्याहत्तरीत पदार्पण केल्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांचा पुण्यात गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. साळुंखे बोलत होते. डॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सवी गौरव समिती आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. साळुंखे यांची ग्रंथतुलाही करण्यात आली. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
डॉ. साळुंखे यांनी तरुणांना उद्देशून सांगितले, ‘हजारो वर्षं तुम्हाला उपलब्ध नसलेल्या अनेक संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘थंडी आणि उष्णतेला जे काडीइतंकही महत्त्व देत नाहीत, त्याचं सुख त्याला सोडून जात नाही,’ असे गौतम बुद्धांचे एक वचन आहे. यात थंडी आणि उष्णता हे शब्द अडीअडचणी, संकटे या अर्थाने वापरलेले आहेत. नवे घडवत असताना नकारात न गुंतता काही निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. हिंसाचाराचा मार्ग अवलंबू नये.’
‘‘हा कोणाचा, हा कोणाचा’ असे म्हणू नये. ‘हा आमचा, हा आमचा’ असे म्हणावे,’ हे महात्मा बसवेश्वरांचे वचन मी नेहमी लक्षात ठेवतो. म्हणजे कोण कोणत्या जातीचा, धर्माचा हे महत्त्वाचे नाही. माणूस म्हणून समोरचा किती चांगला आहे हे महत्त्वाचे. चांगला माणूस होणे ही परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता होण्याची पूर्वअट आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करायचे, तर विधायक, न्याय्य बुद्धीने आणि समतोल विचारानेच करायला हवे. भारतासारख्या संमिश्र समाजात आंतरिक ऐक्य राहिले नाही, तर देश एकरूप असणार नाही. म्हणून मतभेद, अनिष्ट चाली-रीती दूर करताना एकमेकांना समजून घेणे, संवाद ठेवणे, एकमेकांबद्दल आदर बाळगणे आवश्यक आहे.’
‘निळू फुले आणि नागनाथअण्णा नायकवडी या दोन व्यक्तींनी जे प्रोत्साहन मला दिले, त्याला तोड नाही. त्यांची आठवण होते आहे. भाई वैद्य, एन. डी. पाटील मला मार्गदर्शन करायला अजून आहेत. विश्वकोषात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्रावर शंभर लेख लिहिण्याची संधी मला देणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचीही तीव्रतेने आठवण होते आहे,’ असे डॉ. साळुंखे यांनी नमूद केले.
‘कोणतीही पार्श्वभूमी नसताना साहित्य, संस्कृती क्षेत्रात डॉ. साळुंखे यांनी दिलेले योगदान पाहून त्यांच्याबद्दल केवळ अभिमानच वाटतो असं नव्हे, तर त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याची भावना निर्माण होते,’ असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.
(या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)